Wednesday, June 22, 2016

नया प्यार है, नया इंतजार...!

नया प्यार है, नया इंतजार...! 
            'प्रेम' हा शब्द जरी दोन अक्षरी असला तरी त्याच्या अर्थाची व्याप्ती फार मोठी आहे. 'प्रेम काय आहे' या प्रश्नाच उत्तर शोधताना 'प्यार दोस्ती है' अस सोप्प उत्तर देणारा 'कुछ कुछ होता है' मधला शाहरुख खान आठवल्याशिवाय राहत नाही. मैत्रीत प्रेम असते पण प्रेमात मैत्री आवश्यकच आहे का...? मैत्रीशिवाय प्रेम सफल होऊ शकत नाही का...?? आणि जर का प्रेमामध्ये मैत्री असणे जरुरी असेल तर मग सर्वात खास मैत्रीणीलाच प्रेयसी बनवायला काय हरकत आहे...??? प्रेमाची गुंतागुंत सोडवताना असे नानाविध प्रश्न निर्माण होत राहतात. त्यांची उत्तरे अनेकदा सापडतच नाहीत.
           'मैत्रीण' आणि 'प्रेयसी' ही खर तर दोन वेगवेगळी नाती...! निखळ मैत्री ही पाण्यासारखी निर्मळ असते. त्यात वासनेचा कोणताही गंध नसतो परंतु प्रेयसीला पर्याय नसतो. सरळमार्गी पुरुष एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलींशी मैत्री ठेवु शकतो पण प्रेयसीची जागा कोणा एकालाच देता येते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पर्याय मिळत नसतो आणि ती गोष्ट जर दस्तरखुद्द प्रेम असेल तर मग नाहीच नाही. बुट, चपला, कपडे या गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळतात. जर मिळाल्याच नाहीत तर आपण त्या हव्या तशा तयार करुन घेऊ शकतो पण प्रेमाच तस नसत. प्रेमाच्या बाबतीत आणखी एक सांगितल जात की ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्याशीच सर्वात जास्त भांडतो. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातुन कधीही निघुन जावु नये किंवा जो माणुस आपल्या आयुष्यातुन निघुन गेला तर आपल्याला खुप त्रास होईल अस वाटत... आपल्याला जाणवत... त्याच्याशीच आपण खुप भांडतो. पण भांडल्याने नाती टिकतात का...? नक्कीच नाही...! नात टिकण्यासाठी दोन्ही बाजुला प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते. दोघांपैकी एकटा कितीही प्रेम करत असेल, त्याची नात टिकवायची मनोमन इच्छा असली तरी तो त्या एकतर्फी नात्यात अपयशीच ठरतो. समोरच्या व्यक्तीने नात तोडायच नक्की केल असेल तर तिला निर्णय घेण्यापासुन पराव्रुत्त करणे चुकीचे ठरते. भांडण करुन अथवा जबरदस्तीने नात टिकेलही पण प्रेम नाही. निसर्गनियमानुसार साप एका ठराविक कालावधीनंतर कात टाकतो. नात्यांचही तसच आहे. दोघांमधील भांडणांनी एक ठराविक मर्यादा ओलांडली की त्या भांडणांचे वादात रुपांतर होण्याअगोदर ते नात कितीही प्रिय असल तरी तोडावच लागत. बांधीलकी आहे म्हणुन नात तसच जपत बसायच का...? की पटत नसेल तर वेगळ होऊन पुढे जायच...?? या द्विधा मनस्थितीत आपण नेहमी वावरत असतो. मन आणि बुद्धी या वादात बुद्धीला महत्व द्यायच म्हटल तरी प्रेमात मनाच कोणीच ऐकत नाही. आता माझ्याकडची सायकल कधीही पंक्चर होऊ शकते. अगदी तसच माझ प्रेमही कधीतरी पंक्चर होऊ शकत. ब्रेक-अप करण्यासाठी म्हणुन जगात कोणीच प्रेम करत नाही ना…! पण मग त्या पायरीपर्यँत एखाद नात पोहोचल असेल तर मग आयुष्यच संपल्यासारख वाटत. कुठेतरी खचल्यासारख होत. आयुष्यातील अत्यंत महत्वाची, एकमेकांवर तुटुन प्रेम करायची सोन्यासारखी वर्षे भांडण्यात वाया जातात. पण मग नात तोडुन वेगळ होण्यापेक्षा प्रेयसीला पुढे जाऊ देत आपुलकी तशीच ठेवुन वेगळ होण्यात काय चुक आहे...? यदाकदाचित पुढे जाऊन समोरच्याला त्याची चुक समजली, पश्चाताप झाला आणि निर्णय बदलला तर प्रेमाची गाडी पुन्हा रुळावर आणताही येते. किंबहुना तशी धुसर शक्यता तरी नक्कीच दिसत राहते. पण केव्हाकेव्हा ही धुसर शक्यताच आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा बनते. 'ती पुन्हा परत आली तर...' या शक्यतेपायी आपल मन दुस-या कोणा व्यक्तीवर प्रेम करण्यास राजी होत नाही. बहुतांश वेळा 'ती' दुस-याबरोबर संसार थाटुन मोकळी होते. इकडे तिची वाट बघत आपण चांगल्या-चांगल्या स्थळांना नकार देतो, अशातच उमेदीची वर्षे निघुन जातात आणि शेवटी हाती पडतो तो एकाकीपणा...! मला वाटत आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर हा एकाकीपणा नको असेल तर नात्यामध्ये एकमेकांच पटत नसताना योग्य वेळी वेगळ होण्याचा निर्णय घेणे केव्हाही चांगले...! जर तुम्ही तुमच्यातल नात आहे तसच ओढत राहिलात तर नात जीवंत असल्याचा आभास होईल, पण सहवास मात्र होणार नाही.
                शेवटी प्रेम, प्रेम, प्रेम म्हणजे नक्की काय असत...? आपल्याला कोणीतरी हव असत, आपला हात हातात धरणार... आपली स्वप्न शेअर करुन त्याच स्वप्नात जगणार...! माणुस हा तसा नेहमी एकटाच असला तरी त्याला सोबतची गरज असते. जिला मनातली सगळी स्पंदने समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमजेल, महत्वाकांक्षा पेलेल. म्हणुनच प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाप, पुण्य अशा जगातील बाकीच्या गोष्टी त्या प्रेमासमोर क्षुल्लक ठरतात. प्रेम आपल्याला चांगल आयुष्य जगायला शिकवत. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या ध्यासापायी आयुष्यातील कठीणातील कठीण शिखर आपण सर करु शकतो. बाकी कोणत्याही गोष्टी मिळाल्या तरी आयुष्यात समाधान मिळत नाही कारण आपल्याला भरपुर गोष्टींचा हव्यास असतो पण प्रेम मिळाल्यावर आपण सुखी-समाधानी होतो कारण त्या प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी खुपच फिक्या वाटु लागतात. प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त, तितके प्रेम जास्त...! जसे एखाद्या व्यक्तीवर ठरवुन प्रेम करता येत नाही तसेच तिच्यावर कळत-नकळत करत असलेले प्रेम देखील आपण नाकारु शकत नाही. आपले प्रेम योग्य वेळी व्यक्त होणे आवश्यक असते कारण उगाच उशीर करुन अव्यक्त राहिल्यास ती व्यक्ती कायमची गमावण्याची शक्यता दाट असते. जर समोरची व्यक्ती आपल्याकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल तर कोणत्याही खोट्या स्वाभिमानाला किंवा समाजाच्या भितीला बळी न पडता त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार करायला हवा. अशा वेळी मन आणि बुद्धीची सांगड होत नसल्यास एकच गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्येक वेळी बुद्धीने घेतलेला निर्णय योग्य असतोच असे नाही. जेव्हा प्रश्न भावनांच्या गुंतागुंतीचा असतो तेव्हा बुद्धीपेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करावे. करियर, करियरच्या मागे अधाशासारखे धावुन कमावलेला पैसा आपल्याला आयुष्यात क्षणिक आनंद मिळवुन देतो पण सुख-शांती देऊ शकत नाही. खर समाधान तर आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो तिच्या नजरेतुन व्यक्त होणा-या भावनेमध्ये दडलेले असते. कितीही पैसा खर्च करुन आपण ते समाधान मिळवु शकत नाही.
               आजकाल नात्यांवर डेली सोप सिरीयलचाच प्रभाव जास्त पडलेला दिसतो. प्रेमात असताना छोटया किंवा मोठया पडद्यावरील एखादी जोडी आपल्याला आदर्श वाटु लागते आणि आपल्यातील प्रेम देखील अगदी त्याच जोडीप्रमाणे फुलत जावे, अशी भाबडी आशा वाटत राहते. दुर्देवाने पडद्यावरील जोड्या पाहणं आणि ख-या आयुष्यातील प्रेम निभावण यात जमीन आसमानाचा फरक असतो. नात हे कधीही फिल्मी असु शकत नाही. आपल नात फुलवण्यासाठी जितके शक्य असेल तितके प्रयत्न अवश्य करावे पण ते अगदी चित्रपटातील नात्याप्रमाणे आदर्शच असायला हवे हा अट्टाहास करु नये. नात आदर्श बनवण्याच्या नादात ते तुटण्याचीच शक्यता जास्त असते. काही जोडप्यांची एकमेकांमध्ये जितकी जास्त भांडण होतील तितक आपल एकमेकांवर जास्त प्रेम आहे, अशी भंपक समजुत झालेली असते. चित्रपट पाहुन असले मुर्खासारखे निष्कर्ष काढु नका. तुमच्यात सतत भांडणे होत असतील तर तुमच्या दोघांची मानसिकता पुर्णपणे विरुद्ध दिशांना जाणारी आहे आणि अशी नाती फार काळ टिकत नाहीत. अनेकदा स्वभावात साम्य नसल, अगदी परस्परविरोधी स्वभाव असले तरी काही जोडपी सुंदरपणे नात निभावुन नेतात कारण त्यांच्यात प्रेम निभावण्यासाठी लागणारे सामंजस्य असते आणि या सामंजस्यामुळेच त्यांच्यातील प्रेम उत्तरोत्तर वाढत जाते. कुठल्याही नात्यात प्रेयसीच्या मित्रावरुन किंवा प्रियकराच्या मैत्रीणीवरुन संशय घेत काही लोक विनाकरण भांडण करत स्वतःला मानसिक त्रास करुन घेतात. त्यापेक्षा अंतर्मुख होऊन अशा फालतु गोष्टींना विनाकारण महत्व देत दोघांनाही मनस्ताप करुन घेण्यापेक्षा नात्याला जास्त महत्व देणे केव्हाही चांगले. तुम्हाला तिच्या सानिध्यात आल्यावर पुर्ण समाधानी, मोकळ, सुरक्षित आणि आनंदी वाटत असेल तर तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे अस समजायला काहीच हरकत नाही. प्रेमात आपल्यासाठी आपल्या जोडीदाराने बदलाव ही अपेक्षाच करणच मुळी चुकीच असत कारण जोडीदार आहे तसा स्वीकारला जातो तेव्हा त्या नात्याचा पाया अधिक घट्ट झालेला असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा गुणदोषांसकट केलेला स्वीकार त्या नात्याच्या खरेपणावर शिक्कामोर्तब करतो. अशावेळी ते नात आपोआप फुलत राहत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे गुण-दोष सगळ काही माहित असत आणि त्याचमुळे प्रत्येक गोष्टीवर सामंजस्याने तोडगा काढण्यास मदत होते.एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारल्यामुळे परस्परांबाबत लागणारा आदर आपोआप मिळतो. नात्यामध्ये परस्परांबाबतची मत, जाणीवा, आचारविचार यांचा आदर राखण फार महत्वाच असत. एखाद्या प्रसंगी आपला जोडीदार कसा रिअँक्ट होईल हे ग्रुहीत धरलेल असेल तर बहुतांश वेळा तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. केवळ जोडीदारामुळे तुम्हाला तुमची स्वप्न, करिअर, प्राधान्यक्रम बदलावे लागत असतील तर तुम्ही त्या नात्यात वाहवत चालला आहात. म्हणुनच सांगतो जेव्हा तुम्हाला स्वतःला कुणासाठी बदलाव लागत नाही तेव्हा तुम्ही परमेश्वराने तुमच्यासाठी बनवलेल्या जोडीदारासोबत आहात याची खात्री बाळगावी. आयुष्यात प्रत्येकालाच ज्यांना आपल मानाव अशी माणस भेटतातच असे नाही. काही वेळा आपली माणस भेटतात पण आयुष्यभरासाठी आपली साथ न देता अर्ध्यावरच सोडुन जातात. म्हणूनच अशीच एखादी 'खास' व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्याने आली असेल तर तिला ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे कधी ना कधी सांगावेच लागते.
.
              लेखाचा शेवट करताना मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात एक सुंदर डायलाँग आठवतोय- "प्रेमाची पुढची पायरी असते ती म्हणजे लग्न...! पुर्वी देवदेवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पाडला जायचा तो म्हणजे लग्न...!! त्यानंतर 'हनीमुन' नावाची एक संकल्पना असायची परंतु आताची पिढी इतकी पुढारलेली आहे की हल्ली लग्नाआधीच एकमेकांच्या खुप जवळ येऊन आपण त्या नात्यातील गोडवा घालवतोय. नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात आहे. तो हनीमुनचा पहिला स्पर्श... पहिली मिठी... त्या रुममधील ते दोघे नवरा-बायको... दोघे अनोळखी असले तरी एकमेकांना समजुन घेण्याची सुरुवात लग्नानंतरच व्हायची... गर्दीतुन चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श... ते लाजण... वाट बघण... शिंकण्याच्या सवयीपासुन ते जेवणाच्या चवीपर्यँत एकेक गोष्ट हळुहळु समजत जायची. ती मजा आजकाल लग्नाआधीच्या मजेमुळे हरवत चाललीय. आजची पिढी नात्यांना उलगडुच देत नाहीये."
            गेली काही वर्षे प्रेमाच असच एक हळव नात उलगडण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला पण समोरच्याला 'प्रेम' या शब्दाचीच किळस वाटत असेल तिथे मी तरी काय करणार...? मी अपुरा पडलो पण प्रेम या शब्दावर माझी आजही पुर्ण श्रद्धा आहे. म्हणुनच प्रेमाचा हा स्वर्गीय अनुभव मी याच जन्मी घेऊ इच्छितो. दुनियादारीतल्या एम.के. प्रमाणे मला दुस-या जन्माची वाट नाही बघायचीय. मागच्या वेळच्या सगळ्या चुका टाळुन जिला प्रेमाचे मुल्य ठाऊक आहे अशाच मुलीशी मला प्रेम करायचय. प्रेमात मैत्री असणे आवश्यक आहे म्हणुन एखाद्या मुलीच्या प्रेमात पडुन मैत्री करण्यापेक्षा, यावेळी मला माझ्या सर्वात जवळच्या मैत्रीणीवरच प्रेम करायचय. प्रेमाच नात उलगडण्यात असणारी मजा अनुभवत हे आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायचय.

No comments:

Post a Comment